सोमवार, ९ डिसेंबर, २०१३

कोऱ्या पाटीवर काय लिहितात ते पाहावे लागेल

परवाच्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत आम आदमी या नवजात पक्षाला लक्षणीय यश मिळाले आहे.  भ्रष्टाचार संपवण्याचे आश्वासन देऊन ' आप 'ने हे यश मिळवले आहे.  मात्र व्यवस्थेत शिरून व्यवस्था दुरुस्त होईल हे सांगणे कठीण आहे. कारण व्यवस्थेचा स्वभाव "आपुल्यासारखे करती तत्काळ " असा असतो, हे आपण यस प्राईम मिनिस्टर सारख्या टीव्ही मालिकांमधून पाहिले आहे.  शिवाय ज्यांना व्यवस्था बदलवायची आहे त्यांना व्यवस्थेत शिरायची घाई का होते हे अनाकलनीय आहे.  सद्द्यस्थितीतील दोष दाखविणे फारच सोपे असते व ज्यांची पाटी  कोरीकरीत असते त्यांनी भरघोस आश्वासन देण्यात त्यांचे काहीच नुकसान नसते.  दुसऱ्याला खलनायक ठरविले की मोहिम सोपी होते. राजकारण्यांना व लोक प्रतीनिधिंना चोर म्हणणारेच शेवटी या दिक्षांत  समारंभात रांग लावू न उभे राहिले.  १९७७ साली आणीबाणी नंतर होणारी निवडणूक हि शेवटचीच आहे अशी आवई उठवण्यात आली होती व जयप्रकाशजींच्या मार्गदर्शनाखाली संधीसाधूंनी अशीच सुप्रशासन देण्याची ग्वाही दिली होती.  मात्र  २८ महिन्यातच हा भ्रमाचा भोपळा फुटला.  त्यांनंतर पुन्हा एकदा एका इतरांपेक्षा वेगळ्या पक्षाने रामराज्य आणण्याची घोषणा करून सत्ता मिळविली होती.  तेव्हा त्यांची पाटी कोरी होती. आधी १३ दिवस, नंतर १३ महिने व त्यानंतर पाच वर्षे एवढ्या मुदतीत त्यांनी सुप्रशासन आणण्याचा प्रयत्न करून पहिला.   त्यातूनही जनतेचा भ्रमनिरास झाला. त्यांच्या कोऱ्या पाटीवर ते काही सुलेखन करू शकले नाहित. गेल्या काही दिवसांपासून, १९७७ साली जयप्रकाशजींनी बजावलेली भूमिका अण्णा  हजारे यांच्याकडे आली.  मात्र त्यांचा अर्जुन त्यांनी सांगितलेली गीता ऐकण्याच्या भानगडीत न पडता सरळ युद्धाला सामोर गेला व बऱ्यापैकी शौर्य गाजवून मोकळा झाला.  आता अण्णारुपी कृष्णालाही या अर्जुनाचा राज्याभिषेकाची खात्री वाटायला लागली आहे.  

आता व्यवस्था या नव उत्साहींना केव्हा गिळते याची वाट पाहणेच जनतेच्या नशिबी असेल यात मला  तरी शंका वाटत नाही. कारण एखादी व्यक्ती कितीही सज्जन, सुजान, विवेकी, विचारवंत, प्रामाणिक, निर्भीड, निपक्षपाती, कैवारी वगैरे असला तरी एखाद्या पक्षात काम करणे म्हणजे हायकमांडचे म्हणणे ऐकावेच लागते.स्वताचा विवेक गुंडाळून ठेवावा लागतो. पक्षासाठी निधी गोळा  करावा लगतो, कार्यकर्त्यांची, नातेवाईकांची कामे करावी लागतात. अगदी ब्रम्हचारी असलेल्या पंतप्रधानालाही  मानलेली मुलगी व पर्यायाने मानलेला जावई असू शकतो. जनतेचा आजपर्यंतचा अनुभव असा आहे कि ज्याला चांगला उमेदवार  म्हणून निवडून द्यावा तो चांगलाच राहील याची खात्री देता येत नाही. किंवा व्यवस्था त्याला आपल्यात सामावून घेते. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद हे उपाय चाणक्य नीतीत सांगितलेले आहेत. ज्या वाहिन्यांनी 'आप  ' च्या कार्यकर्त्यांची पालखी डोक्यावर घेतली होती त्याच वाहिन्या काही दिवसांतच ' आप 'ची काही कुलंगडी बाहेर काढता येतील काय या खटपटीला लागतील. 

एका शास्त्रज्ञाने असे म्हटले होते कि मला या पृथ्वीवर जमिनीपासून तीन फुट वर उभे राहण्यासाठी कुणी जागा उपलब्ध करून दिल्यास मी या पृथ्वीला लाथेने उडवू शक्तो. कारण त्याला माहित होते कि गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे तीन फुट वर उभे राहायला जागा मिळणे शक्य नाही व पृथ्वीला लाथेने उडविनेही शक्य नाही.  तसेच व्यवस्थेत शिरून व्यवस्था सुधारणे ही  शक्य नाही हे या तथाकथित समाजधुरीणांना समजत नसेल काय? आतापर्यंतचा अनुभव असा आहे कि वाघावर स्वार होणे सोपे असते मात्र पायउतार झालोकी वाघ स्वाराला गट्टम करतो.  या वाक्प्रचारात एव्हढाच फरक करावा लागेल कि आतापर्यंत जे जे या वाघावर स्वार झाले ते पायउतार झाल्यावरही स्वतः सुरक्षित राहिले व वाघ जनतेचाच फडशा पाडत आला. 

' आप ' हिकमतीने वाघावर स्वार तर झाला आहे.  पाहूया किती मजल गाठतो.  कारण सुरवातीलाच कुणाला पाठिंबा द्यायचा किंवा कुणाचा पाठिंबा घ्यायचा हा पेच  ' आप 'समोर उभा राहणार आहे. पाहूया ' आप ' आपल्या कोऱ्या पाटीवर काय लिहितो ते. घोडामैदान जवळच आहे. 


राजेंद्र कडू , अमरावती 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा