शनिवार, १९ एप्रिल, २०१४

महिनाभर थांबता आले असते

पंतप्रधानांचे प्रसिद्धी सचिव, व माजी कोळसा सचिव यांची पुस्तके नुकतीच प्रकाशित झाली आहेत. त्यामुळे कॉंग्रेस पक्ष अडचणीत आला आहे. मात्र या दोघांनीही आपली पुस्तके प्रकाशित करण्यासाठी आताचीच वेळ का निवडली असावी ही  शंका मनात उभी राहते. सध्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. व गेल्या ५/१० वर्षात सरकारने केलेल्या कामगिरीचा पंचनामा विरोधी पक्ष करत आहेच. त्यांना मदत व्हावी असा या दोन्ही लेखकांचा हेतू उघड आहे. निवडणुकांच्या प्रचारात काही ठळक मुद्द्यांवर आरोप-प्रत्यारोप, खुलासे-प्रतिखुलासे होत असतात. उदा. शरद पवार यांनी  "अर्ध्या चड्डीवाल्यांच्या हाती सत्ता देणार काय " अशी टीका करताच उद्धव ठाकरे यांनी "चड्डीची काळजी करण्याऐवजी आपल्या लेन्ग्याची नाडी सांभाळा "असा प्रतिटोला दिला मात्र जर एखाद्याने पुस्तक लिहून कोणावर काही आरोप केले असतील तर पत्रकार परिषद घेऊन त्याचा प्रतिवाद केला जाऊ शकत नाही. त्यासाठी त्या पुस्तकाचा संपूर्णपणे अभ्यास करून लेखकाने उपस्थित केलेल्या प्रत्येक मुद्द्याचा समाचार घ्यावा लागतो. किंबहुना त्यासाठी दुसरे एखादे पुस्तकच लिहावे लागते. आणि निवडणुकांच्या धामधुमीत हे शक्य नसते. कारण निवडणुका म्हणजे ट्वेंटी-ट्वेंटी सामना आणि अशा या ट्वेंटी-ट्वेंटी सामन्यात बारू आणि पारेख हे कसोटी सामन्याप्रमाणे दिवसभर खेळून परत खेळाच्या शेवटच्या दिवशी टाकली जाणारी अनिवार्य वीस षटके टाकत आहेत. हे नक्कीच कॉंग्रेसपक्षावर अन्याय करणारे आहेत.
यां सर्व प्रकरणात बारु यांनी आपण किती विश्वासार्ह आहोत हे दाखवून दिले आहे. आणि बारू आणि पारीख हे दोघेही सर्व गैरप्रकार  डोळे मिटून पाहत होते. म्हणजे आपल्या देशातील नोकरशाही राजकारण्यांची किती मिंधी झाली आहे हे उघड होते. या सर्व प्रकरणाला दुसरीही बाजू आहे ती म्हणजे जर विरोधी पक्षाचे सरकार सत्तेवर आले तर मानाच्या जागा मिळण्याची तरतूद करून ठेवणे. अर्थात याचे उत्तर नवीन सरकार आल्यावरच मिळेल. सध्यातरी रामशास्त्र्यांची मांदियाळी कॉंग्रेसरुपी राघोबादादांना देहांत प्रायश्चित्त फर्मावण्यास पुढे सरसावली आहे. पेशवेकालीन रामशास्त्री सत्ताधाऱ्याला शिक्षा ठोठावून नंतर पुणे सोडून काशीला जाउन निवांत राहायला गेले होते. सध्याचे रामशास्त्री असे निवृत्त जीवन जगायला तयार आहेत काय ? की नव्या
 " काशी नरेशा "च्या दिल्ली विजयाकडे डोळे लावून बसले आहेत.
स्पेन मधील बुलफाईट या अत्यंत घृणास्पद क्रीडा प्रकारात एका उमद्या व उर्जेने सळसळणाऱ्या बैलाला चार पाच वीर खेळवून खेळवून तलवारीने पुन्हा पुन्हा भोसकून ठार मारतात. आताच ही पुस्तके प्रकाशित करण्याचा प्रकार बुलफाईट या खेळाची भारतीय आवृत्ती तर नव्हे. यापूर्वीही भारतीय जनतेने १९७७ व १९८९ आणि १९९८ साली अशा या बुलफाईट ची प्रचीती घेतली आहे. आणि कॉंग्रेसरुपी वृषभ पुन्हा पुन्हा जिवंत होऊन त्याच्या मारेकऱ्याविरुद्ध लढा देतो आहे.( नेहरूंच्या काळात कॉंग्रेसचे निवडणूक चिन्ह बैलजोडी हे होते ) स्पेनच्या बुलफाईटमध्ये मुख्य मारेकऱ्याला Matador असे म्हणतात तो घोड्यावर बसून (इतर मारेकरी पायी असतात) बैलावर तलवार चालवतो व शेवटचा घाव घालून  बैलाला ठार मारण्याचा मान त्याचा असतो. आपणही अशा एखाद्या देशभर घोडदौड करणाऱ्या Matador च्या शोधात आहोत काय ? शेवटी  मला असे वाटते की या दोन्ही रामशास्त्र्यांनी आपली पुस्तके प्रकाशित करण्यासाठी निवडलेली वेळ ही निषिद्ध मानल्या गेलेल्या कार्यशैलीत  ( unfair practice ) बसणारी आहेत. संपूर्ण मतदान आटोपल्यानंतर १३ मे रोजी त्यांना आपली पुस्तके प्रसिद्ध करता आली असती. त्यासाठी महिनाभर थांबता आले असते.पण म्हणतात ना युद्धात (आणि निवडणुकात ) सर्व काही क्षम्य असते. पण बारू आणि पारेख उठली निवडणूक लढवताहेत.
राजेंद्र कडू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा