सोमवार, २८ एप्रिल, २०१४

अपघाती, आवडते आणि नावडते पंतप्रधान 

आज जो मध्यमवर्गीय मतदार डॉ. मनमोहनसिंग यांची टिंगलटवाळी करण्यात मश्गुल आहे, तो मतदार 2009च्या लोकसभा निवडणुकीत डॉ. मनमोहनसिंग यांच्या पाठीशी ठाम उभा राहिला होता. त्यामुळे अपघाती पंतप्रधान म्हणून त्यांची हेटाळणी करण्याऐवजी अपघाताने पंतप्रधान झालेल्या डॉ. मनमोहनसिंगांनी आपल्या लोकप्रियतेच्या बळावर 2009मध्ये काँग्रेसला मोठे यश मिळवून दिले, म्हणून संजय बारू यांनी त्यांचे कौतुक करायला हवे होते. पण मग 'सोनियांच्या हातचे बाहुले' अशी प्रतिमा पुस्तकातून उभी करणे जड गेले असते. 

संजय बारू या माध्यम सल्लागाराने आणि केंद्र सरकारात सचिव राहिलेले पी. सी. पारख यांनी निवडणुकीच्या तोंडावर प्रकाशित केलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांतून टपल्या मारून डॉ. मनमोहनसिंग यांचे अवमूल्यन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ही वेळ साधली नसती तर सगळीच पुस्तके रद्दीत विकावी लागून प्रकाशकाला आíथक फटका बसला असता, हा अर्थविचारही पुस्तक प्रकाशनावेळी झाला असेल.

द हा वर्षांचा कार्यकाल पूर्ण करून पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग महिनाभरात निवृत्त होतील. हा दहा वर्षांचा काळ मोठय़ा बदलाचा आणि विकासाचा मोठा पल्ला गाठणारा काळ राहिल्याने डॉ. मनमोहनसिंग यांची दखल इतिहासाला घ्यावी लागणार आहे. आज मात्र ते देशाचे अदखलपात्र आणि असहाय पंतप्रधान आहेत. निवृत्तीपूर्वीच ते गुमनामीच्या अंधारात गेले आहेत. कोणीही यावे आणि टपली मारून जावे, इतके पंतप्रधान दुबळे वाटू लागले आहेत. त्यांच्या हाताखाली काम केलेल्या संजय बारू या माध्यम सल्लागाराने आणि केंद्र सरकारात सचिव राहिलेले पी. सी. पारख यांनी निवडणुकीच्या तोंडावर प्रकाशित केलेल्या वेगवेगळ्या पुस्तकांतून अशाच टपल्या मारून डॉ. मनमोहनसिंग यांचे अवमूल्यन करण्यात आपला खारीचा वाटा उचलला आहे. संजय बारू आणि पी. सी. पारख यांनी लिहिलेल्या दोन वेगवेगळ्या पुस्तकांत चíचले गेलेले विषय आणि घटना वेगवेगळ्या आहेत, सूत्र मात्र समान आहे आणि एकमेकांना पूरक आहे. संजय बारू यांनी आपल्या पुस्तकातून 'काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या हातचे कळसूत्री बाहुले' अशी डॉ. मनमोहनसिंग यांची प्रतिमा रंगविली आहे. पी. सी. पारख यांनी त्यापुढे जाऊन हाताखालचे मंत्रीही पंतप्रधानांचे ऐकत नव्हते, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकांमध्ये चíचले गेलेले विषय नरेंद्र मोदी यांच्या निवडणूक मोहिमेचा प्रमुख आधार असल्याने निवडणुकीच्या धामधुमीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांचा बोलविता धनी नरेंद्र मोदींची निवडणूक मोहीम तर नाही ना, अशी शंका येणे स्वाभाविक आहे. ही वेळ साधली नसती तर सगळीच पुस्तके रद्दी दुकानदाराला विकावी लागून प्रकाशकाला आíथक फटका बसला असता, हा अर्थविचारही पुस्तक प्रकाशनाची वेळ निवडताना झाला असेल, ही शक्यतादेखील नाकारता येत नाही. पुस्तकामागची तिसरी प्रेरणा मात्र सिद्ध आहे. हे दोन्हीही सद्गृहस्थ डॉ. मनमोहनसिंग आणि त्यांच्या सरकारकडून दुखावले गेले आहेत. या दोघांना डॉ. मनमोहनसिंग यांनी वाचविले नाही किंवा त्यांना वाचविता आले नाही, हे खरे आहे. आपली माध्यम सल्लागार पदावरून हकालपट्टी करण्यात सोनियांच्या जवळच्या माणसांचा हात होता, ही संजय बारूंची खात्री असल्याने डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर तीर सोडण्याचा बहाणा करून सोनिया गांधींवर निशाणा साधला आहे. कोळसा खाण वाटप प्रकरणात पंतप्रधानांनी पी. सी. पारख यांना सीबीआय चौकशी आणि गुन्हा दाखल करण्यापासून वाचविले नाही किंवा वाचवू शकले नाहीत, हे सत्य असल्याने त्यांनी डॉ. मनमोहनसिंग यांना दुबळे समजणे आणि ते दुबळे असल्याचे सिद्ध करण्याचा आटापिटा करणे स्वाभाविक आहे. पंतप्रधानांबद्दल आज देशात खालच्या पातळीवर जाऊन जी टीकाटिप्पणी होते आहे, ते लक्षात घेता या पुस्तकांवर डोळे झाकू विश्वास ठेवला जाण्याचा धोका असल्याने संजय बारू आणि पी. सी. पारख यांच्या पुस्तकांकडे डोळेझाक करता येत नाही.
संजय बारू म्हणतात त्याप्रमाणे 2004मध्ये मनमोहनसिंग कोणाच्या ध्यानीमनी नसताना पंतप्रधान झालेत हे खरे आहे. त्या वेळी एकाही मतदाराने डॉ. मनमोहनसिंग पंतप्रधान होतील किंवा व्हावेत, म्हणून मतदान केले नव्हते. त्या अर्थाने ते अपघाताने झालेले पंतप्रधानच होते. पण पाच वर्षांनंतर झालेल्या निवडणुकीत विजयी होऊन डॉ. मनमोहनसिंग यांनी शपथ घेतली ती अपघाताने नव्हे. लोकांनी डॉ. मनमोहनसिंग हेच पंतप्रधान व्हावेत, म्हणून काँग्रेसला भरभरून मतदान केले होते. त्या वेळीदेखील डॉ. मनमोहनसिंग सरकारचा भ्रष्टाचार आणि सोनियांच्या हातातील बाहुले असलेला पंतप्रधान हेच निवडणुकीत भाजपचे नेतृत्व करणार्‍या अडवाणींचे प्रचाराचे सूत्र होते. पण जनतेने हा प्रचार धुडकावून लावत काँग्रेस आणि डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर विश्वास दाखविला होता. विशेष म्हणजे आज जो मध्यमवर्गीय मतदार डॉ. मनमोहनसिंग यांची टिंगलटवाळी करण्यात मश्गुल आहे, तो मतदार डॉ. मनमोहनसिंग यांच्या पाठीशी ठाम उभा राहिला होता. त्यामुळे अपघाती पंतप्रधान म्हणून त्यांची हेटाळणी करण्याऐवजी अपघाताने पंतप्रधान झालेल्या डॉ. मनमोहनसिंगांनी आपल्या लोकप्रियतेच्या बळावर 2009मध्ये काँग्रेसला मोठे यश मिळवून दिले, म्हणून संजय बारू यांनी त्यांचे कौतुक करायला हवे होते. पण मग 'सोनियांच्या हातचे बाहुले' अशी प्रतिमा पुस्तकातून उभी करणे जड गेले असते. आता आहेत तशा 2004 ते 2009 या काळातसुद्धा सोनिया गांधी सरकारच्या सल्लागार समितीच्या अध्यक्ष होत्या. त्या आणि या कार्यकाळात सोनिया आणि डॉ. मनमोहनसिंग यांचे संबंध सारखेच सौहार्दपूर्ण होते. जो लोकांना न पटलेला मुद्दा 2009 च्या निवडणुकीत अडवाणी मांडत होते, तोच मुद्दा नरेंद्र मोदी मांडताहेत आणि आता लोकांना तो पटूदेखील लागला आहे. 2004चे अपघाताने झालेले पंतप्रधान 2009मध्ये आवडते पंतप्रधान बनले आणि आता नावडते पंतप्रधान म्हणून निवृत्त होत आहेत. लोकांच्या दृष्टिकोनात बदल झाला आहे, त्याची कारणे वेगळीकडे शोधावी लागतील. सोनियांच्या ताटाखालचे मांजर असल्यामुळे असे झाले, हे म्हणणे उथळ आणि सवंग आहे.
कोळसा मंत्रालयात सचिव राहिलेले पी. सी. पारख आपल्या पुस्तकात दावा करतात, त्याप्रमाणे कोळसा खाणींचे वाटप लिलाव पद्धतीने करण्याचा प्रस्ताव रेटण्यात पंतप्रधान अपयशी ठरले, हे खरे आहे; पण हा प्रस्ताव पंतप्रधानांना का मागे घ्यावा लागला, याबाबतीत सत्यकथन करण्याऐवजी हाताखालचे मंत्री पंतप्रधानांचे कसे ऐकत नव्हते, याचे किस्से ते सांगत सुटले आहेत. हाताखालचे मंत्री ऐकत नसतील हे खरेही असेल; मात्र त्याचा आणि लिलाव पद्धतीने खाणवाटप करण्यात आलेले अपयश याचा अर्थाअर्थी संबंध नाही. वाजपेयी सरकारने सरकारच्या र्मजीनुसार कोळसा खाणी वाटपाचे अवलंबिलेले धोरण बदलून लिलावाने वाटप करावे, असा डॉ. मनमोहनसिंग यांचा आग्रह होता आणि त्यासंबंधीचा त्यांचा प्रस्ताव खाणी असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकजुटीने नाकारला होता. या मुख्यमंत्र्यांत भाजप, मार्क्‍सवादी आणि काँग्रेससह अन्य पक्षांच्या मुख्यमंत्र्याचा समावेश होता. हा प्रस्ताव मान्य झाला नाही म्हणून पंतप्रधानांनी खाणवाटपासाठी नियम आणि कोळसा मंत्रालयाच्या सचिवाच्या अध्यक्षतेखाली समिती बनविली. खाणवाटप घोटाळ्यात राजकीय नेते आणि उद्योगपती अडकले ते पंतप्रधानांनी बनविलेले नियम डावललेत म्हणून. पी. सी. पारख अडकले ते त्या खाणवाटप समितीचे अध्यक्ष होते म्हणून. त्यांना सीबीआयने अडकविले म्हणून पुस्तक लिहून पंतप्रधानांना अडकविण्याचा प्रयत्न करणे आणि निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांच्या हाती कोलीत देण्याचा प्रयत्न करणे गैर होते. ज्या पंतप्रधानांनी कोळसा खाण वाटपात पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला, त्याच पंतप्रधानांवर कोळसा घोटाळ्याचा आरोप होत असताना सत्य मांडण्याऐवजी पी. सी. पारख यांनी पंतप्रधानांवरील संशय गडद करण्याचा खटाटोप निवडणुकीच्या तोंडावर करून औचित्यभंग केला आहे.  

सुधाकर जाधव  ( सामाजिक कार्यकर्ते ) , email --- sudhakarjhadhav@gmail.com 
(दिव्या मराठी Today )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा