गुरुवार, २४ मार्च, २०१६

आणीबाणी फक्त उत्तर भारतातच होती काय ?   ……… 

इंदिरा गांधींचे नाव घेतले की आणीबाणी आपोआप आठवते. पण ही आणीबाणी फक्त उत्तर भारतातच होती काय असाही एक प्रश्न पडतो. खरे पाहता एकदाचा  हुकुमशहा म्हणजे नेहमीसाठीचा हुकुमशहा असतो.  हुकुमशहा सत्ता कधी सत्ता सोडत नाही. निवडणुका घेतल्या तर त्या थातूरमातुर असतात व हा हुकुमशहाच पुन्हा प्रचंड बहुमताने निवडून येतो. भारतात मात्र वेगळेच घडले. लोकनायकांनी पोलिस व लष्कराचे जवान यांना केलेल्या "वरिष्ठांचे आदेश तुम्हाला अनुचित वाटत असल्यास ते पाळू नका" या आवाहनामुळे  देशात अराजक माजण्याची शक्यता होती. त्यामुळे नाइलाजाने आणीबाणी लावावी लागली. ही आणीबाणी नंतर दोन वर्षाच्या आत (25 June 1975 तो 21 March 1977) उठविण्यात आली व निवडणुका जाहीर करण्यात आल्या.

आणीबाणीच्या काळात निरनिराळ्या पक्षाचे नेते/कार्यकर्ते तुरुंगात टाकण्यात आले होते . सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येउन जनता पक्षाची स्थापना करण्यात आली. जनता पक्षाला बहुमत मिळाले. मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. आणीबाणीच्या काळात जनतेवर अत्याचार झाले व म्हणून कॉंग्रेसचा पराभव झाला असे बोलल्या गेले. मात्र या निवडणुकांचे वैशिष्ट्य म्हणजे उत्तर भारतात कॉंग्रेसचा सफाया झाला तर दक्षिण भारतात जनता पक्षाला एकच जागा मिळाली. ती म्हणजे पी. रामचंद्रन यांची (ते ही कॉंग्रेस मधून बंडखोरी करून जनता पक्षात आले होते). म्हणजे जनता पक्षाला एकही जागा दक्षिण भारतात मिळाली नाही.साहजिकच एकमेव निवडून आलेला उमेदवार असल्यामुळे त्यांना केंद्रात मंत्रिपदही मिळाले.

म्हणजे राजकिय नेते जे सांगतात की आणीबाणीतील अत्याचारामुळे कॉंग्रेसचा पराभव झाला हे जर मान्य केले तर असे म्हणावे लागेल की आणीबाणीत अत्याचार फक्त उत्तर भारतातच झालेत.  दक्षिणेत तसे अत्याचार झाले नाहीत असा निष्कर्ष काढावा लागेल. मग दक्षिण भारत हा भारताचा भाग नव्हता काय ?
महाराष्ट्राने मात्र तेंव्हा संतुलन राखले एकूण ४८ जागांपैकी कॉंग्रेसला २० तर अन्य पक्षांना २८ जागा मिळाल्या. या वेळेसही महाराष्ट्राने लोकसभा व विधानसभा निवडणुकात संतुलन राखले व कोणत्याही एका पक्षाकडे झुकला नाही. महाराष्ट्रच तो.
महाराष्ट्र म्हणजे देशाचा संतुलन बिंदू .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा