आतापर्यंत कुणीही दुसरा गांधी होऊ शकला नाही. ....
बरेचदा काही व्यक्तींचा दुसरा गांधी, तिसरा गांधी असा उल्लेख वाचण्यात येतो. मात्र गांधीजींच्या जवळपासही पोहोचणारा कुणी दिसून येत नाही. १९७४-७५ मध्ये विरोधी पक्षाने जयप्रकशजींना वापरून घेतले. आणि २०१३-१४ मध्ये विरोधी पक्षाने अण्णांना वापरून घेतले. अण्णा बाळबोध होते. ते पण लोकनायक यांनाही परिपक्वता दाखविता आली नाही. सैनिक व पोलिस याना वरिष्ठांचे 'अयोग्य' वाटणारे आदेश न पाळण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्याचे काय दुष्परिणाम होतील याची त्यांनी विचार केलेला दिसला नाही. गांधीजींनीही परकीय सत्ता असून असे आवाहन केले नव्हते. ज्याना परकीय सत्ता आवडत नव्हती ते स्वत:हून आपल्या नोकर्या/शिक्षण सोडून स्वातंत्र्य चळवळीत भाग घेत होते. सैनिक पोलिसांना राजकीय आवाहन करणे चुकीचे आहे. मोदींनीसुद्धा निवडणूक प्रचारात कॉंग्रेस सरकार तुमची काळजी घेत नाही असे माजी सैनिकांच्या मेळाव्यात म्हटले होते. अर्थात मोदींकडून आम्ही परिपक्वतेची अपेक्षाही करत नाही. पण लोकनायकांकडून ही अपेक्षा नव्हती. लोकनायक हे थोर पुरुष होते पण थोर पुरुषही चुका करतात. त्यांना नंतर त्याबद्दल पश्चातापही झाला असेल पण त्यांनी तसे जाहीरपणे कबुल केले नाही. याबाबतीत गांधीजी मात्र प्रांजळपणे आपल्या चुका काबुल करायचे. नजीकच्या भविष्यात तरी दुसरा किंवा तिसरा गांधी होणे शक्य नाही. जो आपल्या अनुयायांच्या जयघोषात वाहून जातो तो गांधी होऊ शकत नाही. अनुयायांचा विरोध पत्कारणाराच गांधी होऊ शकतो.
जयप्रकाशजींनी बांधलेले हे गाठोडे २८ महिन्यातच सुटले. व ज्यांची हुकुमशहा म्हणून संभावना करण्यात आली होती त्या इंदिराजी प्रचंड बहुमताने १९८० साली पुन्हा पंतप्रधान झाल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा