बुधवार, ८ जानेवारी, २०१४

वेगात दौडले वीर भारतीय चार ........

पराभूत होऊन परत आलेल्या सात मराठी सरदारांची शिवाजी महाराजांनी निर्भत्सना केल्यामुळे ते सातही शूर सरदार आल्यापावली परत जाऊन शत्रू सैन्यावर तुटून पडले व अतुलनीय शौर्य गाजवून शहीद झाले असा इतिहास आहे. त्यांच्या या शौर्याचे वर्णन करणारी " वेगात मराठा वीर दौडले सात " अशी कविताही मराठी साहित्यात आहे. नरेंद्र मोदी सध्या जोशात आहेत. व संपूर्ण भारतभरातून त्यांना पाठिंबा मिळतांना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर परवाच्या पत्रकार परिषदेत पंतप्रधानांनी " मोदी  हे देशाला विनाशाकडे घेऊन जातील " असे विधान केले. तत्पूर्वी काही महिन्यांपूर्वी प्रख्यात कन्नड लेखक अनंतमूर्ती यांनी " मोदी जर पंतप्रधान झाले तर आपण देश सोडून जाऊ " अशी घोषणा केली होती. नुकत्याच सासवड येथील साहित्य संमेलनात जेष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनीही मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर कडाडून टीका केली व मोदी हे फासिस्ट प्रवुत्तीचे आहेत. असे मत प्रदर्शित केले. मराठीत इजा बिजा तिजा, अशी एक म्हण आहे. या तीनही मान्यवरांवर भाजपकडून कडाडून टीका केल्या गेली. खरे  पाहता पंतप्रधान मौनी बाबा आहेत अशी टीका होत असते तेंव्हा जर ते काही बोलले तर ते गंभीरपणे घेतल्या जायला पाहिजे होते परंतु तसे झाले नाही. अनंतमूर्ती हे सुद्धा विचारवंत आहेत असे परवापर्यंत बहुतेकांचे मत होते. परंतु आपल्या बाजूने बोलला तर तो विचारवंत, नाही तर भंकस अशी एक धारणा आजकालच्या राजकारण्यांमध्ये संक्रमीत झालेली दिसत आहे. उदा. युती सरकारवर टीका केल्यामुळे ती सहन न होऊन बाळ ठाकरे यांनी लगेच मराठी माणसांच्या मनामनात  आपले स्थान निर्माण केलेल्या नामवंत साहित्यिक पु. ल. देशपांडे यांना बैल म्हटले होते तर साहित्य संमेलन म्हणजे बैलबाजार आहे अशी संभावना केली होती.कुमार केतकर गेली ४० वर्षे पत्रकारितेत आहेत व बड्या वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केलेले आहे/करत आहेत. त्यांना मोदी समर्थकांनी वेडे ठरविले आहे.

या तिघांनी त्या मनाने मोदींवर फारच सौम्य भाषेत टीका केली आहे. मात्र गुजरात दंगलीनंतर लगेचच महाराष्ट्रातील प्रख्यात साहित्यिक, नाटककार विजय तेंडूलकर यांची प्रतिक्रिया लोकांच्या विस्मरणात गेलेली दिसते. त्यांनी म्हटले होते की "मला जर पिस्तुल मिळाले तर मी पहिली गोळी मोदी यांना घालेल." तेंव्हा त्यांच्या या विधानाने थोडी फार खळबळ माजली होती व नंतर ती शांतही झाली होती. कारण मोदी त्यावेळी  विचारवंतांच्या हिटलिस्टवर नव्हते. ते केवळ एका राज्याचे मुख्यमंत्री होते व देशाचे खूप मोठे नुकसान करू शकणार नाहीत अशी या विचारवंतांची खात्री होती. आता मात्र विचारवंतांना काळजी पडली आहे. वर उल्लेख केलेल्यांपैकी कुणीही व्यक्ती राजकारणी नाही. मनमोहनसिंग अराजकीय पंतप्रधान आहेत व आतातर त्यांनी आपली निवृत्ती जाहीर केली आहे. व  " अब तुम्हारे हवाले वतन साथीयो " अशीच भावना त्यांच्या मनात असावी असे वाटते. त्यांच्या विधानाचा कोणताही वैयक्तिक फायदा त्यांना मिळणार नाही. त्यामुळे या चौघांचेही वक्तव्ये पाहून " वेगात भारतीय वीर दौडले चार " अशी काव्यपंक्ती सुचते. आता येत्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत यांची संख्या चारच राहते की एकशे चार कोटी होते हे पहावे लागेल. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटात  एकविसाव्या शतकात शिवाजी महाराज विचारतात कि एवढा मोठा महाराष्ट्र आणि सातच वीर का दौडले होते, सात हजार का नाही ? सध्यातरी  तोच प्रश्न विचारावा लागेल एवढामोठा भारत आणि चारच वीर का ?

राजेंद्र कडू
rajendra.kadu02@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा