सोमवार, २८ एप्रिल, २०१४

कोडग्या दांभिकांचे अस्त्र

(28-04-2014 )
एकदा मी एका कॉलेजच्या कार्यक्रमात गेलो होतो. पाहुण्यांचे सत्कार स्वागत सुरू झाले. माझा नंबर आला. प्राचार्य उठले. शिरस्त्याप्रमाणे सेवकाने ट्रे पुढे केला. त्यात एक उंदरी शाल होती, उकललेल्या कागदात खूप दिवसांपासून बांधून ठेवलेला गुलाल होता. त्याने आता आपला रंग बदलायला सुरुवात केली होती. फिरून आलेला किंवा फिरवला जाणारा पुष्पगुच्छ होता. सवायीनुसार प्राचार्यांनी उजव्या हातांची दोन बोटे गुलालात बुडविली. मी उभाच. लावायची वेळ आली तेव्हा थबकले. ‘कुठे लावू?’ मलाच विचारू लागले. मी पक्का. मी म्हणालो, ‘‘कुठेही लावा.’’ झाली का पंचाईत. ते असमंजसमध्ये. मी म्हणालो, ‘‘उरका की’’ त्यांनी अवसान गोळा करीत विचारले, ‘कपाळाला लावले तर चालेल का?’ मी विचारले, ‘‘का नाही?’’ बुजत बुजत त्यांनी लावले. गुलालाचा भुकटा चक्क नाकावर घरंगळला. सत्कार स्वागत झाल्यावर मी जागेवर बसलो. रुमाल काढून सगळा गुलाल पुसला. प्राचार्य म्हणाले, ‘‘आमच्या येथील मुसलमान प्राध्यापक कपाळाला गुलाल लावून घेत नाहीत. आम्ही त्यांच्या गळ्याला लावतो.’’ मी म्हणालो, ‘‘ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी एवढेच म्हणू शकतो, की माझा धर्म इतका कच्चा नाही की तो तुमच्या एवढुश्या गुलालाने बाटून जाईल.’’ माझ्या निष्ठा काचेच्या नाहीत की त्यांना दगड लागताच त्या चूरचूर व्हाव्यात.
एरवी सख्या बहिणींना मालमत्तेतून बेदखल करणार, दारू पिऊन बायकोला मारहाण करणार, बाहेरख्यालीपणा करणार, लाच देऊन बेकायदेशीर कामे करून घेणार, क्रूरपणे पैसे खाणार, विधवांचे प्लॉट हडप करणार, म्हातार्‍या आई बापांना छळणार तरी गुलाल लावून घेणार नाहीत वा गोल टोपी घालणार नाहीत म्हणत संस्कृती जपण्याचा आव आणणार. हा कोडगा दांभिकपणा आहे. असे लोक समाजाची फसवणूक करीत असतात. खरे बोलावे, खरे वागावे, बंधुभाव ठेवावा, ही धर्माची साधी पायाभूत शिकवण. एका बाजूला ही शिकवण पदोपदी पायदळी तुडवायची व दुसर्‍या बाजूला गुलाल लावून घ्यायचा नाही किंवा गोल टोपी नाकारायची. या विसंगतीने ना धर्म टिकतो ना संस्कृती. हल्ली ही विसंगती इतकी अंगवळणी पळलीय, की या विषयीचे प्रश्न आता कोणाला मनातल्या मनातदेखील पडत नाहीत. सगळीकडे जेव्हा अध:पात होतो, तेव्हा लोक आपला धर्म, प्रतीकांमध्ये पाहू लागतात. दुबळे समाज प्रतीकांच्या बाबतीत आग्रही बनतात.
निवडणुकीच्या काळात हेच दुबळे समाज लक्ष्य असतात. राजकारणात समुदायांना संदेश देण्यासाठी प्रतीकांचा वापर केला जातो. गोल टोपी घालून इफ्तार पार्टीत फोटो काढणारे आणि टीव्ही चॅनेल समोर गोल टोपी नाकारणारे दोघेही संदेश देण्यासाठी उतावीळ असतात. टोपी घालणारे एका गटाला चुचकारत असतात. टोपी नाकारणारे दुसर्‍या गटातील भाबड्यांवर आपल्या वटाची छाप पाडत असतात. सामान्य माणसांच्या आयुष्य बदलांशी याचा कवडीचाही संबंध नसतो. पण, नेत्यांच्या या कृतीतून त्यांना विशिष्ट संतुष्टी लाभत असते. हा आपला आणि तो परका याचा त्यांना पडताळा करता येतो. जोपर्यंंत टोळ्यांचे अस्तित्व राहील तोपर्यंंत प्रतीकांचा उच्छाद आवरता येणार नाही.
आपल्या देशाच्या घटनेने ‘एक व्यक्ती एक मत’ असे तत्त्व निश्‍चित केले आहे. व्यक्तीला मताचा अधिकार दिला. कुटुंबाला, जातीला, धर्माला, प्रदेशाला वा भाषक समूहाला दिला नाही. अपेक्षा अशी होती, की माणूस टोळीच्या अवस्थेतून उन्नत होऊन क्तिस्वातंत्र्याच्या दिशेने पाऊल टाकेल. पासष्ट वर्षे झाली. चौदा वेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या. कमी अधिक विधानसभेच्या. कमी अधिक जि.प., पंचायत समित्या, ग्राम पंचायती, नगर पालिकांचे मतदान झाले. शेकडो निवडणुका झाल्या. आपण कधी तरी व्यक्ती म्हणून मतदान केले का? आपण झुंडीचा घटक म्हणून मतदान करणार असू, तर झुंडींना खेचणारे संदेश देणार्‍या नेत्यांना आपण दोष कसा देणार? यात मेख अशी आहे, की तुमचे झुंडीत राहणे हे त्यांच्या सोयीचे आहे. तुम्ही झुंडीत असाल, तर झुलवले जाऊ शकता हे त्यांना ठाऊक आहे. तुम्हाला झुंडीत ठेवायचे असेल, तर तुमची प्रगती होऊ द्यायची नाही. नुसता प्रगतीचा आभास निर्माण करायचा. हा उद्योग त्या चालाख लोकांनी अव्याहतपणे चालविला. आम्ही त्यांच्या चालींकडे न पाहता, एकमेकांच्या झुंडींचा द्वेष करीत राहिलो. एकमेकांशी झुंजत राहिलो.
जोपर्यंंत दारिद्रय़ाच्या बेड्या तुटत नाहीत तोपर्यंंत आपण अशाच निरर्थक गोष्टीत बुचकळत राहू. प्रतीकांमध्ये आपल्या अस्मिता पाहू. भावना भडकावणार्‍यांना नेते मानू. तुंबलेल्या या अंधार्‍या डबक्यातील किंचाळणारे कीडेच आम्हाला नायक वाटत राहतील. गुलाल असो की गोल टोपी, यातून आपण कधी बाहेर पडू? कधी आपण ‘आपले मत’ ठरवू? कधी झुंडीत झुलण्याचे सोडू? कधी जगू माणसासारखे? कधी माणसाला माणूस म्हणू? त्याचा सन्मान करू. खरा धर्म कधी आचरणात आणू?--- अमर हबीब  ( फेसबुकवरून )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा