सोमवार, ७ एप्रिल, २०१४

हुकुमशाहीकडून लोकशाहीकडे

मतपेटीतून हुकुमशाहीकडे हा लेख व त्यावरील प्रतिक्रिया वाचल्या. के.र. शिरवाडकर यांनी नेहरू, इंदिरा यांच्या हुकुमशाहीचा पाढा वाचला. मात्र १९७५ साली आणिबाणी लावण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे तेंव्हा सरकारविरुध्द सुरु असलेल्या आंदोलनाचे नेतृत्व करणारे जयप्रकाशजी यांनी एक फारच बालिश आवाहन केले होते . त्यांनी म्हटले होते की पोलिस व सैनिकांनी, जर त्यांना, त्यांच्या वरिष्ठांनी दिलेले आदेश योग्य वाटत नसतील तर ते पाळू नये. हे फारच भयानक होते व त्यामुळे अराजक माजू शकले असते. स्वातंत्र्य चळवळ सुरु असतांना इंग्रज अधिकारी मोजकेच होते तर पोलिस व सैनिक हे बहुसंख्येने हिंदुस्थानी होते. मात्र गांधीजींनी असे आवाहन केल्याचे कुठे वाचले नाही. त्यामुके आणीबाणी लावायला केवळ हेच कारण असावे असा निष्कर्ष काढता येतो. दुसरे असे कि अलाहाबाद न्यायालयाने इंदिराजींची निवड रद्द ठरविल्यानंतर त्यांनी लगेच राजीनामा द्यावा असा विरोधकांनी धोशा लावला. आजमात्र हीच मंडळी त्यांच्या एखाद्या नेत्याला खालच्या कोर्टाने दोषी ठरवले तरी, त्याने वरच्या कोर्टात अपील केले आहे व अपिलाचा निकाल लागेपर्यंत तो निर्दोष आहे असे मानतात. इंदिराजींना मात्र हा अपिलाचा हक्क बजावू द्यायला विरोधक तयार नव्हते. यांना मात्र एखाद्या बारक्या प्रकरणात कोर्टाने निर्दोष ठरवले तर लगेच क्लीन चीटचा डंका  पिटण्यात येतो.
दुसरे असे की हुकुमशहा कधिही निवडणुका घेत नाही. घेतल्यातरी थातुरमातुर असतात आणि त्यात तो हुकुमशहाच पुन्हा  " प्रचंड " बहुमतानेच निवडून येतो. इंदिराजींनी मात्र निवडणुका घेऊन पराभव पत्करला.
१९७७ च्या निवडणुकांमध्ये असा प्रचार केल्या गेला होता की या निवडणुका शेवटच्या आहेत. मात्र त्यानंतर बऱ्यांच  निवडणुका झाल्या. १९७५ प्रमाणेच यावेळच्या  निवडणुकीत काही मंडळी परत सैन्याला ओढताहेत. शहिदांच्या विधवांसाठी गळे  काढताहेत. अर्थात यावेळेस आपल्या कारकिर्दीत हकनाक शहीद झालेल्या (१७ एप्रिल २००१ साली बांगला देश सैनिकांनी १६ भारतीय जवानांना हालहाल करून ठार मारले होते) जवानांची आठवण मात्र येत नाही. खरे पाहत आता इंदिराजी हयात असत्यातर त्यांही पुन्हा एकदा आणिबाणी लावून या तोंडाळाना धडा शिकवला असता. त्यामुळे लोकसत्ताच्या वाचकांना शिरवाडकरांनी भविष्यापेक्षा इतिहास पहा असे जरी सुचविले आहे तरी मला मात्र इतिहासापेक्षा भविष्यच जास्त काळे कुट्ट दिसत आहे.
राजेंद्र कडू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: