विशाल भारतीय महासंघाची शक्यता !
आणखी काही वर्षांनी पाकिस्तान किंवा बांगलादेश स्वत:हून भारतात विलीन होतील. कारण झालेले विभाजन अनैसर्गिक आहे. एक सारखी संस्कृती असलेल्या भूभागांचे विभाजन जास्त दिवस टिकत नाही असाच ईतिहास आहे. या तिन्ही देशातील जनता धर्मांधांच्या कट्टरतेला कंटाळेल व जनमताचा रेटा एव्हढा वाढेल की त्याचे पर्यावसान एकत्रीकरणाकडे वाटचाल करण्याकडे होईल. विशेष म्हणजे कट्टरतेची वाटचाल तिन्ही देशात अगदी समांतर अशी चालू आहे. दोन जर्मनी एक झाले. दोन विएतनामही एक झाले.युरोपमध्ये दोन डझनाहून जास्त देशांनी एकत्र येउन युरोपिअन महासंघ स्थापन केला. तसेच भारत, पाकिस्तान, बांगलादेश एकत्र येतील. सोबत नेपाळ, भुतान, ब्रम्हदेश ,श्रीलंका हे सुद्धा आम्हाला तुमच्यात घ्या अशी विनवणी करतील व एक विशाल भारतीय महासंघ अस्तित्वात येईल असे वाटते. अर्थात भाजप सत्तेत नसला तरच हे शक्य होईल. अतिरेकी राष्ट्रवादामुळे जर्मनीची शकले झाली होती. एव्हढेच नव्हे तर बर्लिन शहराचेही दोन तुकडे झाले होते. सत्तर वर्षापूर्वी जर अतिरेकी राष्ट्रवादामुळे हे होऊ शकले तर आता तर त्याची शक्यता जास्तच वाढली आहे. कारण इतक्या वर्षांमध्ये पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. जग खूप जवळ आले आहे. थोड्याशाही फुंकरीने कुणाच्या अस्मितेला केंव्हा आणि कसे घुमारे फुटतील हे सांगता येत नाही. तरी पण सध्या काही लोकाना आवडत असलेली कट्टरता लोकांच्या मनातून हळूहळू उतरत जाईल. व सहयोगाचे वातावरण निर्माण होईल. कट्टर मार्गी आपले प्रयत्न सुरूच ठेवतील. तरी पण जर सध्यासारखे धसमुसळे सरकार जर सत्तेत नसेल व भारतात एखाद्या समंजस पक्षाची राजवट थोड्या दीर्घ लालावधीसाठी सत्तेवर असले तर एक बृहद भारतीय महासंघ अस्तित्वात येण्याची प्रबळ शक्यता आहे.
राजेंद्र कडू
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा