शुक्रवार, १६ मे, २०१४

हे सर्व कठीण दिसते 

नुकत्याच प्रसिध्द झालेली बातमीनुसार पाकिस्तानने भारताशी सलगीचे प्रयत्न सुरु केले असे समजते त्याबातमीत पुढे एक धक्कादायक घटना नमूद केली आहे. ती अशी --

" संघाच्या वरिष्ठ नेत्याची इस्लामाबाद भेट
पाकिस्तानी दूतावासाने घडवून आणला दौरा
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका वरिष्ठ नेत्याने नुकताच इस्लामाबाद दौरा केला. या दौर्‍यांची संपूर्ण व्यवस्था अमेरिकेतील पाकिस्तानी दूतावासाने केली होती. संघनेत्याच्या या भेटीमुळे तर्कवितर्काला उधाण आले आहे. "

दोनच दिवसांपूर्वी संघाच्या प्रवक्त्याने मोदी सरकारवर संघाचा रिमोट नसेल असे वक्तव्य केले होते आणि आता अशी बातमी आली आहेकी संघाचे अमेरिकेतील पदाधिकारी गुपचूप पाकिस्तानचा दौरा करतात याचा अर्थ काय लावायचा. पाकिस्तानशी संबंध सुरळीत राहावे म्हणून सरकार बाह्य प्रयत्न झाले पाहिजेत असे सर्वच विचारवंतांचे मत आहे. परंतु युपीएच्या काळात झालेल्या अशा प्रयत्नांची मोदीनी हेटाळणी केली होती हे लक्षात घेतले पाहिजे.
माझ्या मते पाकिस्तान सरकार आणि संघ परिवार यांनी कितीही ठरवले तरी त्यांचे बेत तडीस जातील याची शक्यता कमीच आहे. पाकिस्तानातील मुलकी सरकार हे नामधारी आहे. खरी सत्ता लष्कर, मुल्ला-मौलवी, व दहशतवादी यांच्या हातात आहे. ते भारतात शांतता नांदू देतील असे वाटत नाही. १९९८ ते २००४ या काळात एनडीएचे सरकार असतांना भारतात दहशवतवादी कारवायांमध्ये मोठी वाढ झाली होती व गृहमंत्री असलेल्या अडवाणींना दररोज पत्रकार परिषद घेऊन यामागे पाकिस्तानचा हात आहे असे सांगणे एवढेच काम उरले होते. अडवाणींच्याच काळात दहशवाद्यांची संसदेवर हल्ला करण्यापर्यंत मजल गेली होती. अक्षरधाम मंदिर व रघुनाथ मंदिरावरही बॉम्ब हल्ले होऊन ५० भाविक म्रुत्युमुखी पडले होते. शेवटी युपीए सरकार आल्यावर गृहमंत्री शिवराज पाटील यांनीच या दहशतवाद्यांचा बंदोबस्त केला होता. आताही दहशतवाद्यांना न आवडणारे सरकार भारतात सत्तेवर आले आहे. त्यामुळे यापुढचा काल कठीण आहे. अडवाणीसारखाच गृहमंत्री पुन्हा देशाला मिळाला तर पुन्हा निष्पापांचे बळी जाऊ शकतात. 
देशातील सर्वच विचारवंत काहीही झाले तरी पाकिस्तानच्या मुलकी सरकारशी बोलणी सुरूच ठेवली पाहिजेत या मतांचे होते. कारण त्यामुळे तेथील मुलकी सरकारला भारताचा पाठींबा आहे असा संदेश दहशतवाद्यांना गेला असता. परंतु या सर्व विचारवंतांची हिंदुत्ववाद्यांनी नेभळट अशी संभावना केली. सोबत युपीए सरकारलाही भेकड ठरविले गेले. पाकिस्तानल ठोशास ठोसा असे उत्तर आपल्या सरकारने द्यावे असे काही सतत वाटत होते. परराष्ट्र संबंध नावाचा काही प्रकार असतो हे सामान्य जनतेला माहित नसते, व विरोधी पक्षानेही याबातीत जनतेचे प्रबोधन करण्याऐवजी तापलेल्या तव्यावर आपली पोळी भाजून घेतली. आता संघनेत्याला पाकिस्तान दौरा का करावासा वाटला याचा खुलासा झाला पाहिजे. या संघ परिवाराच्या भेटीमुळे भारताची शान कमी होणार नाही काय? हा प्रकार म्हणजे भाजपची उक्ती वेगळी व कृती वेगळी हे स्पष्ट करते. 
आजच प्रसिध्द झालेल्या बातमीनुसार पाकिस्तानने आपला एक जवान मारला व दोन जखमी झाले, तसेच पाकिस्तानने दोन भारतीय पत्रकारांना देशाबाहेर हाकलले. आता मोदी सरकार लगेच पाकिस्तानशी युध्द सुरु करणार काय ?  " शहीदोकी विधवाये माफ नही करेगी हे वाक्य आता मोदींना भुतासारखे छळत राहणार हे नक्की. 
राजेंद्र कडू
 















कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: