रविवार, १३ जुलै, २०१४

सीमेपलीकडची अस्सल जिंदगी  
पाकिस्तानातील एका मित्राने सांगितलेली ही गोष्ट आहे. एकदा एक मौलवी आपल्या अनुयायांना सांगत होता, 'मेरी बात पर विश्वास करो..' उर्दूत 'विश्वास' हा शब्द नाही. तरीही भारतीय चॅनल्सच्या प्रभावामुळे सर्वसामान्यांच्या मुखी तो रुळलेला आहे. सांगण्याचे तात्पर्य म्हणजे, सर्वसामान्यांच्या जोडीने मुल्ला-मौलवींवरदेखील हिंदीचा परिणाम होत आहे. पाकिस्तानातून येणारे माझे बरेच मित्र परत जाताना आपल्या मैत्रिणी किंवा पत्नीसाठी न विसरता बिंदी घेऊन जातात. किंबहुना, भारतीय टीव्ही सीरियल्समुळे पाकिस्तानातही सध्या बिंदीला मोठी मागणी आहे. पाकिस्तानात दिसणारी चॅनल्स एवढी लोकप्रिय झालेली आहेत की, जनरल परवेझ मुशर्रफ राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी भारतीय टीव्ही चॅनल्सवर बंदी आणण्याचा विचार जाहीर केला होता. पण पाकिस्तानी जनतेने आणि केबल ऑपरेटर्सनी त्याला असा काही विरोध केला की, शेवटी मुशर्रफना हा बंदीचा विचार सोडून द्यावा लागला. परंतु ज्या सहजपणे पाकिस्तानी प्रेक्षकांना भारतीय चॅनल पाहायला मिळतात, तितक्या सहजपणे भारतातील प्रेक्षकांना पाकिस्तानी चॅनल वा त्यावरचे कार्यक्रम पाहायला मिळत नव्हते. या पार्श्वभूमीवर, 'झी' समूहाच्या 'जिंदगी' चॅनलमार्फत औन-झारा, जिंदगी गुलजार है, कितने गिरहे बाकी हैं, काश मैं तेरी बेटी ना होती, आसमान पे लिखा.. आदी वास्तवस्पर्शी मालिकांतून पाकिस्तानी समाज आणि संस्कृतीचे भारतातल्या प्रेक्षकांनाही दर्शन होऊ लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: