१९३९ मध्ये औंध प्रान्तात लोकशाही,
महात्मा गांधींचा पुढाकार
संस्थानांची बखर – औंधचा प्रजासत्ताक-प्रयोग
१९३८ साली औंध संस्थानात औंधचे राजे भवानराव पंतप्रतिनिधी, महात्मा गांधी आणि मॉरीस फ्राइडमन (गांधीभक्त पोलिश इंजिनिअर) या तिघांनी मिळून एक अभिनव प्रयोग केला. संस्थानाची सत्ता राजाकडून नागरिकांकडे देण्यात आली आणि १९३९ मध्ये औंधच्या स्वराज राज्यघटनेत तसा कायदा केला गेला. ब्रिटिश राजवटीने प्रत्येक संस्थानाशी वेगवेगळे करार करून, संस्थानिकांना अंतर्गत कारभाराविषयी काही प्रमाणात स्वायत्तता दिली होती. राज्याचा कारभार लोकप्रतिनिधींकडे सोपविण्याची कल्पना प्रथम फ्राइडमनने पंतप्रतिनिधींना सुचविली. भवानराव स्वत: भारतीय स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. त्यांना ही कल्पना पसंत पडली. हा लोकशाहीवादी प्रयोग महात्मा गांधींच्या मार्गदर्शनाखाली करण्याचे दोघांनी ठरविले. वर्धा येथील आश्रमात महात्मा गांधींबरोबर फ्राइडमन व राजे यांच्यात अनेक बठका होऊन औंधसाठी नवीन राज्यघटना तयार केली गेली. या छोटय़ा संस्थानातील प्रयोगामुळे भारतीय स्वातंत्र्यवाद्यांना मोठे उत्तेजन मिळणार असल्याने गांधींनी याबाबतीत पुढाकार घेतला. नवीन राज्यघटनेची सर्व कागदपत्रे, दस्तऐवज तयार झाल्यावर गांधींनी ती २१ जानेवारी १९३९ रोजी स्टेट अॅसेंब्लीकडे मंजुरीसाठी पाठविली. पाच लोकप्रतिनिधींची समिती निवडण्यासाठी राज्यातल्या सर्व मतदारांचे गुप्त मतदान घेण्यात आले. या पाच निर्वाचित प्रतिनिधींच्या पंचायतीकडे राजांच्या सल्ल्याने कारभाराचे हस्तांतर करण्यात आले. राज्याच्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी प्रत्येक खेडय़ातून पाच निर्वाचित सदस्यांची पंचायत समिती व तिचा अध्यक्ष निवडला जाई. प्रत्येक तालुक्यातील पंचायत समिती अध्यक्षांमधून तालुका सल्लागार मंडळासाठी प्रतिनिधी निवडला जाई. राज्याच्या मध्यवर्ती कायदेमंडळात हे तालुका प्रतिनिधी राजाच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेत. १९३९ ते १९४६ या काळात औंधच्या या विधिमंडळाने २७ प्राथमिक शाळा आणि १४ माध्यमिक शाळा निर्माण केल्या.औंधातील हा स्थानिक स्वराज्यसंस्थेचा प्रयोग, संस्थान स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंत यशस्वीपणे राबविला गेला.
सुनीत पोतनीस – sunitpotnis@rediffmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा