शुक्रवार, २० जून, २०१४

माय जगो आणि मावश्याही 

मला सर्व भाषा आवडतात. सर्व भाषा या एकमेकीच्या बहिणी आहेत. पण माय मरो आणि मावशी जगो असे मी म्हणणार नाही. मायही जगो आणि मावश्याही जगो असे माझे धोरण आहे पण  किमान मला महाराष्ट्राततरी मराठी सोडून इतर भाषेत व्यवहार करण्याचे काम पडू नये. महाराष्ट्राच्या बाहेर गेल्यावर माझे कसे होईल याची सरकारने काळजी करू नये. कारण माझे पूर्वज हिंदी राष्ट्रभाषा नव्हती तेंव्हापासून काशी, रामेश्वर, द्वारका, पुरी येथे तिर्थाटनाला जात होते. आणि हिंदी येत नव्हती म्हणून त्यांचे धार्मिक पर्यटन थांबले नाही.
आताही परप्रांतात नोकरी व्यवसायानिमित्त जाणाऱ्या मंडळीचे काहीही अडत नाही. मराठी तरुण तरुणी बंगलोर, हैद्राबाद, चेन्नई येथे आरामात नोकऱ्या करत आहेत. कामचलाऊ हिंदीमिश्रित इंग्रजी बोलून त्यांचे काम भागते. आणि हिंदी बोलतो म्हटले तर हिंदी प्रांतात सुद्धा वेगवेगळी हिंदी बोलली जाते. आम्ही राजस्थानात पर्यटनाला गेलो असता तिथल्या Taxi चालकाने असे मत व्यक्त केलेकी निरनिराळ्या प्रांतातून येणारे प्रवासी जी हिंदी बोलतात ती आम्हाला अजिबात कळत नाही ( या बाबतीत त्याने माझा अपवाद केला व माझे हिंदी त्याला कळत होते असे मत त्याने व्यक्त केले.)

आपल्या देशात राष्ट्रपती होऊन गेलेल्या महामहिम व्यक्तींपैकी अर्ध्या महामहिमांना हिंदी येत नव्हती. विद्यमान राष्ट्रपती महामहिम प्रणव मुखर्जी याना सुद्धा हिंदी येत नाही.  आलटून पालटून राष्ट्रपतीपद एकदा उत्तरेकडील व्यक्तीला तर एकदा दक्षिणेकडील व्यक्तीला हा चांगला पायंडा आमच्या विचारी पूर्वसुरींनी पाडला व राष्ट्रपतींना हिंदी येत नाही ही  बाब गौण ठरली.
या बाबतीत कलम ३७० हे सर्वच राज्यांसाठी लागू करावे. व राज्यांना भरपूर स्वायत्तता द्यावी असे माझे मत आहे. किमान सरकारी वाहिन्यांवर तरी प्राइम टाईम च्या वेळात प्रादेशिक भाषांचे कार्यक्रम प्रसारित व्हावेत. सध्या अशी परिस्थिती आहेकी रात्रीचे आठ वाजलेकी प्रादेशिक भाषांचा कान पिळला जातो व राष्ट्रीय प्रसारण सुरु होते. (अर्थात ज्यांच्याकडे केबल कनेक्शन आहे ते प्रादेशिक भाषांचे कार्यक्रम पाहू शकतात.)
 भाषेच्या बाबतीत सर्वच प्रादेशिक भाषांना राष्ट्रभाषा म्हणून घोषित केले गेले आहे. म्हणजे आपली मराठी सुद्धा राष्ट्रभाषा आहे. भारताची राष्ट्रभाषा अजून ठरलेली नाही जेंव्हा ती ठरेल तेंव्हा ती मराठी असावी असा आपण आग्रह धरू शकतो. किंवा सर्वात आधी अभिजात म्हणून घोषित केलेली तामिळ किंवा प्राचीन भारताची आद्य भाषा व सर्वच भारतीय भाषांची जननी असलेली संस्कृत भाषा याही राष्ट्रभाषा होऊ शकतात. एका सर्वेक्षणानुसार २००१ साली भारतात फक्त ४२ कोटी लोकांनी हिंदी मातृभाषा असलेल्यांची नोंद केली आहे . त्यातही २६ कोटी लोकांनी शुद्ध हिंदी मातृभाषा म्हणून नोंद केली तर इतरांनी हिंदीच्या इतर बोलीभाषा जसे अवधी, ब्रिज , राजस्थानी, हरयाणवी  आपली मातृभाषा असल्याचे नोंदवले आहे. त्यामुळे कुठलीही एक भाषा राष्ट्रभाषा म्हणून घोषित करणे इतर भाषिकांवर अन्याय करणे ठरेल. ही गोष्ट म्हणजे एखाद्या मुलाला बळजबरीने आईच्या मांडीवरून हिसकावून घेऊन मावशीच्या कडेवर देण्यासारखे होईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: