शनिवार, ७ जून, २०१४

रिलायंस आणि भाजपचे साटेलोटे मुंबईकरांचे मेट्रोचे स्वप्न पूर्ण होत असले तरी मेट्रोची उभारणी करणाऱ्या अनिल अंबानी यांची रिलायन्स कंपनी निविदेत निश्चित केल्यानुसार तिकिट दर आकारण्यास राजी नसल्याने मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत जोरदार तोफ डागली. भाजपचे रिलायन्सशी साटेलोटे असल्याचा घणाघाती आरोप करीत मेट्रो तिकिटाचे दर वाढले तर त्याला भाजपच जबाबदार असेल, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले. निविदेनुसार दराची हमी नसेल तर उद्घाटनालाच न जाण्याचा निर्णयही मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.
अंबानी आणि अदानी यांचा मोदी सरकारवर प्रभाव असल्याचे बोलले जाते. याची प्रचीती मुंबईकरांना येईल, असे सूचक विधान मुख्यमंत्र्यांनी केले. मेट्रोसाठी घाई करणारे मुंबईतील भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांचा उद्देश काय किंवा ते कोणासाठी घाई करीत आहेत हे स्पष्टच होते, असा हल्लाही मुख्यमंत्र्यांनी चढविला.
मुंबई मेट्रोसाठी ९ ते १३ रुपयांदरम्यान तिकिटांचा दर आकारला गेला पाहिजे, अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. मात्र रिलायन्स कंपनीने १० ते ४० रुपये दराचा आग्रह धरला आहे. रविवारी मेट्रो रेल्वे सुरू झाल्यावर किमान भाडे नऊ रुपये असेल या अटीवरच प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येईल, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडली. तरीही रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने महिनाभर १० रुपये भाडे आकारले जाईल, असे जाहीर केले.
दरवाढीचा निर्णय हा नव्याने स्थापन करण्यात येणाऱ्या प्राधिकरणाच्या माध्यमातूनच झाला पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. तरीही आम्ही सांगू तसेच होणार या तोऱ्यात रिलायन्स कंपनी वागत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: