बुधवार, १४ जानेवारी, २०१५



प्राचीन शोधांचे दावे पुराव्यांशिवाय पोकळच

खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे परखड मत, विज्ञान काँग्रेसमधील वक्तव्यांवर टीका
फलज्योतिष ही कल्पना भारतीय नव्हेच
फलज्योतिष (प्लॅनेटरी अॅस्ट्रॉनॉमी) या विषयावर आपल्याकडे बरेच वाद होतात. ग्रहांच्या हालचालींचे आपल्या जीवनावर काही परिणाम होतात काय, असा प्रश्नदेखील उपस्थित केला जातो. मुळात फलज्योतिषाची कल्पना ही भारतीय नाहीच. अलेक्झांडर भारतात आल्यावर त्याच्यासोबत अनेक ग्रीक विद्वान भारतात आले होते. त्यांच्या माध्यमातूनच फलज्योतिषाची कल्पना पसरली, असे नारळीकरांनी स्पष्ट केले.
पुराणात विद्युतचुंबकीय विषयाचा उल्लेख नाही
गणितात केरळमध्ये प्रचंड काम झाले. पायथागोरस सिद्धांतातील माहितीचा काही ग्रंथांमध्ये उल्लेख अाहे. मात्र विमानतंत्र, अस्त्र-शस्त्र निर्मितीसह अनेक क्षेत्रांत असे दावे करता येणार नाहीत. अणुबॉम्बसारख्या विध्वंसकारी शस्त्रांचा शोध प्राचीन काळातच लागल्याचा दावा आपल्याकडे केला जातो. विद्युतचुंबकीय विषयाचा अभ्यास केल्याशिवाय न्यूक्लिअसचा विचारही करता येत नाही, असेही नारळीकरांनी स्पष्ट केले.
रमाकांत दाणी | नागपूर
प्राचीनकाळात खगोलविज्ञान आणि गणित या क्षेत्रांमध्ये भारतीयांनी मोठी प्रगती साधली होती. त्याचेे ठोस पुरावेदेखील उपलब्ध असल्याने आपण त्यासंबंधीचे दावे निश्चितपणे करू शकतो. मात्र विमानशास्त्र, संहारक अस्त्र-शस्त्रांच्या क्षेत्रातील भारतीयांच्या प्रगतीबाबत कुठलेही ठोस पुरावे उपलब्ध नाहीत. त्यामुळे कुठल्याही संशोधनावर दावे करताना त्यासंदर्भातील वैज्ञानिक पुरावे आहेत की नाहीत, याची काळजी घेतली पाहिजे, असे परखड मत ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी "दिव्य मराठी'शी बोलताना व्यक्त केले. एका खासगी कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ. नारळीकर नागपुरात आले होते. अलीकडेच मुंबईत पार पडलेल्या भारतीय विज्ञान काँग्रेसमध्ये चर्चेला आलेल्या विषयांवरून बरीच टीका टिप्पणी झाली. प्राचीन काळात विमान तंत्रज्ञानापासून अनेक क्षेत्रांत भारतीयांच्या प्रगतीचे दावे मांडले गेले.
त्या पार्श्वभूमीवर बोलताना डॉ. नारळीकर यांनी वैज्ञानिक नसलेल्या व्यक्तींकडूनच प्रामुख्याने पोकळ दावे होतात, याकडे सुरुवातीलाच लक्ष वेधले. पुराणकाळातील विज्ञानाच्या प्रगतीचे, शोधांचे दावे मांडले जातात. मात्र त्याचे पुरावे अद्याप कोणीही दिलेले नाहीत. दावे करताना पुरावे अत्यंत आवश्यक आहेत. खगोलविज्ञान, गणित यासारख्या क्षेत्रांमध्ये आम्ही निश्चितच प्रगतीवर होतो. त्याचे पुरावे आपल्याकडे उपलब्ध आहेत. मानवी विकासाच्या बाबतीत युरोप अंधारात चाचपडत असताना आपल्याकडे खगोलशास्त्रात बरीच प्रगती झालेली होती, असा दावा त्यांनी केला.(दिव्य मराठी दि. १४/०१/१५)









कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: