बुधवार, ७ मे, २०१४

आधुनिक पंचतंत्र -- अमेठी शैली

पंचतंत्रात एक गोष्ट सांगितलेली आहे. एक गरीब बिचारे निरागस कोकरू ओढ्यावर पाणी प्यायला गेले. पाणी पीत असतांनाच तेथे एक कोल्हा पाणी प्यायला आला. त्या कोकरास खाण्याची त्याची इच्छा त्याच्या मनात आली. काहीतरी भांडण उकरून काढावे म्हणून तो त्या कोकरास म्हाणाला " ये बावळटा तुला दिसत नाही काय ? , मी पाणी पितो आहे. तुझे उष्टे पाणी मला प्यायला लावतो काय ? " यावर कोकरू नम्रपणे म्हणाले " कोल्हे महाशय मी ओढ्याच्या खालच्या बाजूस पाणी पीत आहे, तुम्ही ओढ्याच्या वरच्या बाजूस पाणी पीत आहात. मी तुम्हाला माझे उष्टे पाणी कसे काय प्यायला लावील?  मी माझी पायरी सोडली नाही. " यावर कोल्हा चवताळून म्हणाला " तू मला शिवीगाळ करते आहेस ". कोकरू पुन्हा नम्रपणे म्हणाले " महाराज मी तुम्हाला केंव्हा शिवीगाळ केली, मी तर निमुटपणे पाणी पीत होते. ". 
कोल्ह्याला तर कसेही  करून कोकराला गट्टम करायचे होते. त्याने आगपाखड सुरुच ठेवली. " तू शिव्या दिल्या नसतील तर तुझ्या स्वर्गवासी बापाने दिल्या असतील. आणि तुझ्या बापाने दिल्या नसतील तर तुझ्या स्वर्गवासी आजीने दिल्या असतील. आम्हा कोल्ह्याच्या जमातीला तुम्हा कोकराची  खानदान गेल्या ६६ वर्षांपासून शिवीगाळ करीत आलेली आहे. ". तितक्यात तेथे कोकराचा भाऊ आला. त्यानेही कोल्ह्याला समजावण्याचा प्रयत्न केला. शिवीगाळ करणे हा आमच्या कुटुंबाचा स्वभाव नाही. उलट आमच्या बापाने व आजीने जंगलाच्य रक्षणासाठी आपल्या प्राणाचे बलिदान दिलेले आहे, असे म्हटले. मात्र कोल्हयाची कोल्हेकुई सुरूच होती. ती ऐकून आपल्या साथीदारांच्या समर्थनार्थ  जंगलातील इतर कोल्ह्यानीही त्याच्या सुरात सूर मिळवला .अख्खे जंगल कोल्हेकुइने दणाणून गेले. 

पंचतंत्रातील कथेत कोल्ह्याने कोकराला गट्टम केले होते. मात्र या आधुनिक कथेच्या शेवटासाठी   १६ मे पर्यंत थांबावे लागणार आहे. मात्र तो शेवट असेल कि एखाद्या दु:स्वप्नाची सुरुवात हे काळच सांगेल. विजय शेवटी सत्त्याचाच होतो हे खरे पण तो सर्वात शेवटी होतो. त्याआधी कदाचित असत्याचा विजय होईल आणि दुर्दैवाचे भोग भोगल्यानन्तरच सत्याचा विजय होईल .  जर्मनीने असे भोग भोगले आहेत. आतां कदाचित आपला नंबर असेल. आलिया भोगासी असावे सादर. 
राजेंद्र कडू

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: