शनिवार, २६ डिसेंबर, २०१५

शान घालविली …… 


पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री यांनी पाकिस्तानला भेट देऊन देशाची शान घालवली. या दोघांच्याही पाकिस्तान दौऱ्यामुळे भारत-पाकिस्तान वादात आपलेच खेटर अडले आहे हे भारताने दाखवून दिले. पाकिस्तानातील कुठलाही उच्चपदस्थ भारताच्या दौऱ्यावर आलेला नाही. दौरा ठरणार असेल तर पाकिस्तान काही तरी खुसपट काढून त्याला खीळ घालतो. आताच्या स्पायडरम्यान दौऱ्यामुळे आता पाकिस्तानचे नाक वर झाले आहे. आम्ही गेल्या अठरा महिन्यात त्यांचे शेकडो जवान मारले तरी ते आमच्या दारी आले म्हणजे सगळ्याच चकमकींच्या प्रकरणात चूक भारताचीच असली पाहिजे म्हणूनच ते आमच्या दारावर नाक घासत आले, असे सांगायला पाकिस्तान मोकळा झाला.

नेपाळने आधीच दटावले आहे की, "मित्र आहात, मित्रासारखेच रहा, मोठा भाऊ होण्याचे प्रयत्न करू नका".  खरे पाहता सर्व शेजारील देशांचा मोठा भाऊ म्हणून भारताने आपली प्रतिमा निर्माण केली होती. व या प्रतिमेला गेल्या ६६ (की ६०) वर्षांत धक्का लागला नव्हता. मात्र मोदींनी आतताईपणा करून त्यावर पाणी फिरवले. आणि आतातर आपला परंपरागत शत्रूपुढे सुद्धा आपण गुडघे टेकतो आहोत.

अर्थात असे सौजन्य मोदी स्वकीयांना मात्र दाखवित नाहीत. केजडीवाल २०१३ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्यावर तेंव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री अर्थात मोदी यांना भेटायला गेले असतांना मोदींनी त्यांना भेट नाकारली होती. म्हणजे  केजडीवाल यांना ते पाकिस्तानपेक्षा मोठा शत्रू मानतात काय ?  'घरची म्हणते देवा देवा, आणि बाहेरचीला चोळी शिवा' असा हा एकूण प्रकार आहे.

मनमोहनसिंग यांच्या मौनावर बरीच टीका होते पण बडबडे धांदुल असलेल्यांचे मात्र वेळ आली की अवसान गळते हे पुन्हा एकवार सिद्ध झाले आहे. कुण्या तरी मोदी भक्ताने मोदी हे कृष्णाचा अवतार आहेत असे म्हटले होते. मात्र या कृष्णामध्ये सुदामा द्वारकेला यायची वाट पाहण्याचा धीर नाही हे या प्रकरणावरून सिध्द झाले. नवाज शरीफांनी बेगमने दिलेली पोह्याची पुरचुंडी मोदींना 'पेश' केली असती तर त्यानंतर त्यांनी शरीफांची रावळपिंडी सोन्याची करून टाकली असती तरी भारतीय जनतेने काही हरकत घेतली नसती. शांततेचे नोबल मिळविण्याच्या नादात आपले स्वत्व गमावू नये असेच कुणीही म्हणेल. आपणच आपला आब राखावा हे बरे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: